नवी दिल्ली : सारे देशवासीय ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो मान्सून अखेर आज (आठ जून) केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याने त्याबद्दलची अधिकृत घोषणा केली आहे.
केरळच्या अनेक भागांत आठ जून रोजी सकाळपासून चांगला पाऊस पडत आहे. हे मान्सून दाखल झाल्याचे लक्षण असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. भारतीय हवामान खात्याचे प्रभारी महासंचालक मृत्युंजय मोहापात्रा यांनी त्याबद्दलची माहिती दिली. त्यामुळे पुढील तीन-चार दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.
दर वर्षी मान्सून केरळमध्ये एक जून रोजी दाखल होतो. यंदा पोषक स्थितीचा अभाव, तसेच अन्य वातावरणीय स्थितीमुळे हे आगमन आठ दिवस लांबणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. आठ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असेही हवामान खात्याने सांगितले होते. तो अंदाज खरा ठरला आहे.
यंदा देशात सरासरीइतका पाऊस पडेल, असा दीर्घकालीन अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेली दोन-तीन वर्षे देशाच्या अनेक भागांत समाधानकारक पाऊस पडलेला नसल्याने दुष्काळसदृश परिस्थिती आहे. यंदा पाऊसमान चांगले राहिले, तर ही परिस्थिती सुधारू शकेल, अशी आशा आहे. एल-निनो परिणामाची तीव्रता कमी होत असल्याने भारतीय उपखंडातील पाऊसमान व्यवस्थित राहील, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.